---Advertisement---

मराठवाड्यात मुसळधार पाऊस ; शेतीचे प्रचंड नुकसान, संपर्कमार्ग ठप्प !

By team
On: September 16, 2025 5:12 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत विशेषतः मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पूर आला आहे. यामुळे रस्ते व शहरांना जोडणारे पूल पाण्याखाली गेलेत. त्यामुळे अनेक गावांचा शहरांशी असलेला संपर्क तुटला आहे.

मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतील शेतीचे या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली. पुणे शहरात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. विशेषतः मार्केट यार्ड परिसराला याचा मोठा फटका बसला आहे. मार्केट यार्डमधील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून, सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. या पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला, फळे आणि फुले वाहून जाताना दिसून येत आहे. यामुळे विक्रेते व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील भाजी आणि फळांच्या बाजारात गुडघाभर पाणी साचले आहे. पाथर्डी तालुक्यात मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता परिसरातील पाऊस ओसरला असला, तरी घरांत चिखलाचे साम्राज्य झाले असून अनेकांच्या घरातील साहित्य वाहून गेले आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राक्षसवाडी येथे पाझरतलाव फुटल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. राक्षसवाडी आणि बोधेगाव परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. तर, राक्षसवाडी येथील आणखी एका तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तसेच केकानवाडी (ता. केज) येथेही पाझरतलाव फुटून खालच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पाण्यामुळे शेतं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

राजेवाडी ते डोंगर पिपळा मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. अंबाजोगाई-मांडवा पठाण मार्गावरील वान नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून परिसरातील गावांचा संपर्क खंडित झाला आहे. धारूर–आडस रोडवर पाणी साचल्याने रस्ता बंद झाला आहे. चिचखंडी गावाजवळील वान नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून मोरफळी-आडस मार्गावरील पूल तर वाहून गेला आहे. सदर पुलाजवळ विहिरीचे काम सुरू असताना एक ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहून गेला. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. माकेगाव शिवारातील अनेक शेतं पाण्याखाली गेली आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!