---Advertisement---

महत्वाची बातमी : विराट कोहलीने घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती !

By team
On: May 10, 2025 10:09 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या गळ्यातील ताईत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआयला) आपल्‍या निर्णयाची माहिती दिली आहे. आता आगामी इंग्लंड दौऱ्यावर त्याचा संघातील सहभागाची शक्‍यता कमी असल्‍याचे मानले जात आहे. दरम्‍यान, ‘बीसीसीआय’च्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने कोहली याला निवृत्तीबाबतच्‍या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. आता निवड समिती इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करताना कोहलीच्या भविष्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे क्रिकेट विश्‍वाचे लक्ष वेधले आहे.

विराटच्या आधी, हिटमॅन रोहित शर्माने बुधवारी (७ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. ७ मे रोजी त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि लाल चेंडूच्या क्रिकेटला निरोप दिला. तथापि, तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामने खेळत राहील, जो त्याचा मजबूत मुद्दा राहिला आहे. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर ३८ वर्षीय रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

भारताचा इंग्लंड दौरा २० जूनपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसह सुरू होणार आहे, आणि या मालिकेसाठी कोहली संघात असणार नाही, असे मानले जात आहे. दरम्‍यान, BCCIच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कोहलीशी संवाद साधून त्याला निवृत्तीचा निर्णय पुन्हा एकदा विचारात घेण्याचे आवाहन केले आहे.

कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्‍याची चर्चा ही निवड समितीच्या बैठकीपूर्वी सुरु झाली आहे. इंग्लंडमधील कसोटी मालिकेसाठी अंतिम संघ निवडला जाणार आहे. ही मालिका भारतासाठी नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात असेल. BCCIचे सचिव देवजित सैकिया यांनी यापूर्वी सांगितले होते की, टेस्ट दौऱ्यासाठीचा संघ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्याच्या आधी निवडला जाईल. कोहलीनेही निवृत्ती घेतली, तर भारताच्या कसोटी संघातून मोठा अनुभव गमावला जाईल. फलंदाजी विभागात यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल आणि शुभमन गिल यांच्यावर अधिक जबाबदारी येणार आहे.

२०२४-२५ च्या कसोटी हंगामात विराट कोहलीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला. ऑस्ट्रेलियात झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये कोहलीला फॉर्म सापडला नाही. त्याने एकूण १९० धावा केल्या. मालिकेतील पहिल्या कसोटीत (पर्थ) शतक झळकावल्यावर उर्वरित चार सामन्यांमध्ये केवळ ८५ धावा केल्‍या होत्‍या. याचवेळी त्‍याने संकेत दिले होते की, २०२५चा ऑस्ट्रेलिया दौरा कदाचित त्याचा शेवटचा असेल. आरसीबीच्‍या इनोव्हेशन लॅबच्या इंडियन स्पोर्ट्स समिटमध्ये बोलताना कोहली म्हणाला होता, “कदाचित माझ्याकडे आणखी एक ऑस्ट्रेलिया दौरा शिल्लक नसेल, त्यामुळे जे काही झाले त्याबद्दल मी समाधानी आहे.” दरम्‍यान रोहित शर्मानेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फॉर्म गमावला होता, त्याने ३ सामन्यांत केवळ ३१ धावा केल्या आणि अखेरचा सामना खराब फॉर्ममुळे खेळला नाही. IPL 2025 स्पर्धा स्‍थगित करण्‍यात आली आहे. कोहलीने RCBसाठी ११ सामन्यांत ५०५ धावा केल्या आहेत आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!