ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केला असून आज मनोज जरांगे‎ पाटील यांची निर्णायक इशारा सभा बीडमध्ये पार पडत‎ असून या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता मनोज जरांगे सभास्थळी पोहोचणार आहेत. त्यानंतर ते मराठा समाज बांधवांना संबोधित करणार आहेत.

धुळे-सोलापूर महामार्गावर ‎छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात विस्तीर्ण‎ मैदानात होणाऱ्या सभेसाठी मोठी तयारी पूर्ण झाली असून‎ येणाऱ्या बांधवांसाठी 300 क्विंटल तांदळाची खिचडी, ‎100 क्विंटल साबुदाणा खिचडी, 2 ट्रक केळी आणि 1 लाखाहून अधिक पाणी बॉटलची व्यवस्था केली आहे.‎ याशिवाय सभास्थळी महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारले गेली‎ आहेत. तसेच सभेच्या ठिकाणी वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी 10 रुग्णवाहिका आणि पाटील मैदानाच्या समोरील बिल्डिंगमध्ये उपचार व्यवस्था करण्यात आलेली असून डॉक्टरांची टीम सज्ज असणार आहे. जरांगे यांच्या स्वागतासाठी 200 जेसीबी तयार ठेवण्यात आले आहे. याशिवाय हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे.

सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार. आजच्या सभेत सर्वकाही सांगणार आहे. संयम किती दिवस पाळायचा आम्हालाही मर्यादा आहे. सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस आहे. सरकारने लिहिलेले शब्द सरकार पाळत नाही. आजच्या सभेतून मराठा समाजासमोर सर्व सत्य मांडणार आहे. मराठा समाजाने आणखी किती दिवस अन्याय सहन करायचा. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आमची आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आरक्षण मागत आहोत,” असे जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!