---Advertisement---

राज्यातील अनेक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता !

By team
On: July 30, 2025 10:33 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती देखील निर्माण झाली आहे. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीला सुद्धा पूर आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आज देखील हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना तसेच वसाहतींना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील धरणे जवळपास भरलेली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

विदर्भात देखील आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात सुद्धा पाऊस असणार आहे. विदर्भ आणि कोकणाला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. मुंबईत आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात ढगाळ वातावरण असून आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात मंगळवारी अनेक सोसायटींमध्ये पानी शिरल्याचे देखील समोर आले होते.

रत्नागिरी, रायगड, सातारा, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, भंडारा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे तानसा आणि मोडकसागर धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. सध्या सातही धरणांतील एकूण पाणीसाठा 88.38 टक्क्यांवर पोहोचला असून, हा साठा मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. पुढील काही दिवस धरण परिसरात पाऊस कायम राहिल्यास उर्वरित धरणे देखील लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे.

उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांमधून मुंबईला दररोज 3900 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मार्च-एप्रिलमध्ये धरणातील पातळी कमी झाल्याने मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाची चिंता वाढली होती. मात्र, जून महिन्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. दरम्यान, खडकवासला धरण परिसरात जोरदार पावसामुळे धरणातून मुठा नदीपात्रात सध्या १७,९७४ क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होत असल्याने विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. सध्या खडकवासला धरणाची पाणीपातळी ६२ टक्क्यांवर पोहोचली आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!