मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई महापालिकापूर्वीच सर्वच पक्षातील नेत्यांनी वातावरण तापविण्यास सुरुवात केली असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच मनसेच्या मुंबई अध्यक्ष पदाची घोषणा केली. संदीप देशपांडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे सर्व शाखा अध्यक्षांची जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी पक्षाची केंद्रीय समितीही जाहीर केली.
राज ठाकरे यांनी संघटनेत पहिल्यांदाच एवढे मोठे बदल केले आहेत. केंद्रीय समितीची जबाबदारी नितिन सरदेसाई यांच्याकडे सोपवली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत नवीन पदांची रचना केली आहे. मनसेचे नते बाळा नांदगावकर यांच्याकडे केंद्रीय गट अध्यक्षांची जबाबदारी दिली आहे. मुंबईतील विभाग अध्यक्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या केंद्रीय समितीचे नेतृत्व नितीन सरदेसाई करणार आहेत. मुंबई मनसे गटाध्यक्ष केंद्रीय समिती मध्ये बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांची निवड करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत गटाध्यक्ष महत्वाचा भाग आहे. त्यामुळे नांदगावकर, अभ्यंकर या अनुभवी नेत्यांवर राज ठाकरेंनी ही जबाबदारी सोपवली आहे.
केंद्रीय समिती आम्ही नेमली आहे. केंद्रीय समिती प्रत्येक घटकांकडे लक्ष देतील. मुंबई शहर अध्यक्ष आम्ही निवडला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही रचना लावण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मला जे बोलायचे ते मी बोलेन. ज्याला जे काम दिले आहे, त्यांनी ते जबाबदारीने करावे, अशा सुचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.
मुंबई अध्यक्षपदी निवडीनंतर संदीप देशपांडे म्हणाले की, पक्षाने महत्वाची जबाबदारी दिली आहे. राज ठाकरे यांनी खूप मोठा विश्वास दाखविला आहे. आजपासून मनसेचे मिशन मुंबई महापालिका सुरु झाले आहे. मुंबई महापालिका निवडणूक जोरात लढवली जाईल. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणले जातील. मुंबई महापालिकेत निश्चित बदल दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.