मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीतून काही आमदार घेवून अजित पवार बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर शरद पवार यांच्या गटातील काही नेते त्यांच्यावर टीका नेहमीच करीत असतात पण आता अजित पवार यांची नेहमीच दादागिरी सुरु असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी अजित पवारांवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमक्या देण्याची सवय आहे. त्यांनी वर्षानुवर्षे पक्षात दादागिरीच केली.
अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा शिरुर लोकसभा मतदार संघात पराभव करण्याचा निर्धार केला आहे. तेव्हापासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत राजकीय कलगीतुरा रंगला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हे यांच्या टू द पॉइंट या पॉडकास्टमध्ये बोलताना अजित पवार यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला चढवला. तसेच त्यांच्यावर पक्षात दादागिरी करण्याचा आरोपही केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार यांचा धमक्या देण्याचा स्वभाव पूर्वीपासूनचा आहे. ते उघड धमक्या देतात, हे जनतेला आता दिसून येत आहे. त्यांनी आजपर्यंत तेच केले. शरद पवारांची जवळची चांगली चांगली माणसे त्यांनी तोडून टाकली. ही त्यांची दादागिरी आहे. वर्षानुवर्षे त्यांनी पक्षात दादागिरीच केली. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत कोणतीही संभ्रमावस्था नसल्याचेही स्पष्ट केले. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही. आम्ही एकत्रिकपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कुणालाही पक्षात घेणार नाही. तसेच उपमुख्यमंत्रीही करणार नाही, असे ते अजित पवारांना टोला हाणताना म्हणाले.