नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे प्रकरण तापले असतांना आता या वादात महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मंत्र्यांसह सरकारवर खळबळजनक आरोप केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि, महाराष्ट्रात 2014 ते 19 दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजप युती सरकार असो, या सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही, तर संपूर्ण भाजप युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल यांनी केला आहे.
भाजप युती सरकारचे मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी, खुनी आहे, एका मंत्र्यांवर न बोलता सगळ्यांवरच बोलले पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यावर जे गंभीर आरोप होत आहेत, ते निश्चितच चिंताजनक आहेत. पण हे सर्व भाजपच करत आहे, भाजपचाच आमदार खुलेआमपणे मुंडेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल दररोज करत आहे. पण मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत. भारतीय जनता पक्ष, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातील अंतर्गत वादाचा हा परिणाम आहे का? काँग्रेस पक्षाला त्यांच्या अंतर्गत भांडणात पडायचे नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
राज्यात जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, शेतकऱ्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, सोयाबीन, धान, कांदा उत्पादक शेतकरी बरबाद झाला आहे. सरकारने बांगलादेशी महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे दिले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शिर्डीत कालच दोन हत्या करण्यात आल्या, महिला सुरक्षित नाहीत. परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी विचाराच्या तरुणाची हत्या पोलीसांनी केली. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर करण्यात आला, ही सर्व गंभीर प्रकरणे सरकार लपवत आहे पण विरोधी पक्ष म्हणून या मुदद्यांवर गप्प बसणार नाही, सरकारला या सर्वांची उत्तरे द्यावी लागतील, असे ते म्हणाले.