ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आंदोलक दहशतवादी नाहीत, मराठी माणसं आहेत ; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरुवात केले आहे.  राज्यभरातून विविध मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी,”मराठ्यांना आतापर्यंत वापरुन घेतलं. न्याय मागण्यासाठी मराठी माणूस सूरतला जाणार का?, मराठी माणूस न्याय मागण्यासाठी मुंबईतचं येणार, असं ठाकरे म्हणाले. मुंबई मराठी लोकांची राजधानी आहे. आंदोलक दहशतवादी नाहीत, मराठी माणसं आहेत. सत्ता आल्यास काही दिवसांत न्याय देऊ म्हणणारे आता सत्तेत आहेत. मराठ्यांना देण्यासाठी माझ्या हाती काही नाहीय.युतीमध्ये सध्या घमासान चालू आहे. सरकारने हा प्रश्न सोडवला पाहिजे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही?, असा सवाल उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर या सगळ्या गोष्टी आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितले होते त्यांना विचारले पाहीजे. मी काही बोललो तरी ते काय करतील…, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठ्यांना आतापर्यंत फसविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देणार असे सांगण्यात आले होते. ही सगळी जबाबदारी सरकारची आहे. मी याआधी जरांगे यांच्या समोर माझी भूमिका मांडलेली आणि मी काही ही बोललो तरी सरकार काय करणार हे महत्त्वाचे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!