---Advertisement---

नगरविकास खात्याच्या निधीवर ठेवणार अंकुश ; मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय !

By team
On: July 23, 2025 5:13 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नगर विकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वितरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीनुसार आणि सढळ हाताने पैसे खर्च करण्याच्या सवयीला अंकुश लावण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या सर्व निर्णयामुळे महा युतीत सर्व आलबेल आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे.

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नगर विकास आणि ग्राम विकास ही दोन खाती महत्त्वाची मानली जातात. यापैकी ग्रामविकास खाते हे भारतीय जनता पक्षाकडेच आहे. तर नगर विकास खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. नगर विकास खात्याच्या माध्यमातूनच विविध योजनांचा पैसा हा आमदार आणि महानगरपालिका, नगर परिषद मधील नगरसेवकांना पुरवला जातो. मात्र अलीकडच्या काळात या खात्याकडून केवळ शिंदे गटाच्या आमदार आणि नगरसेवकांनाच रसद पुरवली जात असल्याची तक्रार होत होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता या निधीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अंकुश असणार आहे.

या निर्णयानुसार आता नगर विकास खात्यात मोठा निधी वाटपासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरी नंतर ती फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल. मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतरच निधी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व निधीवर आता भारतीय जनता पक्षाचे देखील अंकुश असणार आहे. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्याला जाणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या आधी देखील जाहीर केले होते. मात्र स्थानिक पातळीवर या निर्णयात काही बदल होऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!