---Advertisement---

अधर्माची वाढ झाली की संतांचा जन्म होतो !

By team
On: January 19, 2024 9:11 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अधर्म झाला की धर्म लोपतो.अधर्माची वाढ झाली की संतांचा जन्म होतो.जगात कुठल्याही मंदिराला नामदेव पायरी सारखी पायरी नाही कारण ती दगडाची पायरी नाही तर ती प्रत्यक्ष चैतन्यमय अशी पायरी आहे अशी पायरी पुन्हा होणे नाही,असे प्रतिपादन श्री संत सद्गुरु ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.

अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे स्व.प्रकाश पाटील यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित किर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. सद्गुरु नायके कृपा केली पूर्ण, निजवस्तू दाविली माझी मज, या संत शिरोमणी नामदेवरायांचा सद्गुरुरायांचे महत्त्व सांगणारा प्रसिद्ध अभंग आहे.या अभंगावर त्यांनी कीर्तन केले.संत शिरोमणी नामदेवराय यांचा परमार्थिक अधिकार उच्च होता.संत हे परमेश्वरांचे अवतार असतात.झाडू संतांचे मार्ग, संतांची शिकवण, संतांचे विचार ,संतांचे संस्कार देण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला असतो. लोपीयेली भक्ती, अधर्म झाला की धर्म लोपतो.अधर्माची वाढ होते.तेव्हा संतांचा जन्म होतो. जगात कुठल्याही मंदिराला नामदेव पायरी सारखी पायरी नाही कारण ती दगडाची पायरी नसून ते प्रत्यक्ष चैतन्यमय अशी पायरी आहे व स्फूर्ती देणारी पायरी आहे इतका अधिकार असतानाही ज्यांनी कीर्तनात मंदिर फिरविले ,धोंड्याला स्पर्श करून परीस केले. प्राणीमात्रांमध्ये त्यांनी देव पाहिला व देव दर्शनाला जाण्याआधी वारकऱ्यांनी त्याची रजधूळ माझ्या अंगावर टाकून देवदर्शनाला जावे म्हणजे पांडुरंगा विषयी त्यांची किती भक्ती आहे हे दिसून येते म्हणून अशी पायरी मागे कधी झाली नाही असे नामदेवराव सद्गुरुरायांचे वर्णन करतात.न विसंबे पाय खेचराचे, म्हणून ते देवाच्या जवळचे होते देवाच्या प्रेमात होते म्हणून त्यांनाही गुरु करावा लागला.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांनी आपल्या आयुष्यात गुरु केला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. सद्गुरु शिष्यांचा अहंकार, अभिमान, मी पणा समूळ नष्ट करतात व अध्यात्माच्या माध्यमातून शिष्याचे कल्याण करतात, असेही ते यावेळी म्हणाले.ह.भ. प आबा महाराज कुरनूरकर व पाटील परिवाराने या कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तन सोहळ्यात विजयकुमार बनसोडे,तुकाराम बनसोडे,आदिनाथ पाटील,नरेंद्र पाटील,तुषार शिंदे,चंद्रकांत माने,विक्रम चव्हाण,औदुंबर खल्लाटे,अशोक घाटगे आदींनी गायन केले.मृदंग साथ हरी ओम पाटील कुरनूरकर,सागर पांचाळ,कृष्णा चव्हाण,मोहन चव्हाण यांनी दिली.या कीर्तन सोहळ्याला जितेंद्र पाटील महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी व परिसरातील महाराज मंडळी आणि कुरनूर पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२० दिंड्या सहभागी
या किर्तन सोहळ्यासाठी अक्कलकोट ,दहिटणे,सिंदखेड,मोट्याळ,शिरवळ,चुंगी,सुलतानपूर,नळदुर्ग दहिटणा,हाळ वागदरी,बाभळगाव,इटकळ,अरबळी,येवती,दिंडेगाव,चव्हाणवाडी,माळेगाव,किणी, किणीवाडी,काझीकणबस परिसरातून २० दिंड्या सहभागी झाल्या होत्या.थंडी असूनही महाराजांच्या किर्तन सोहळ्याला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!