छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
माझ्यावर हल्ला घडवून आणण्याचा डाव आहे. आधीचा डाव फसला मात्र आता पुन्हा तसा डाव आखला जात आहे, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केलाय. जरांगे पाटलांनी केलेल्या या दाव्यामुळे मराठा बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
जरांगे पाटील आजपासून दोन दिवसांच्या संवाद दौऱ्यावर जात आहेत. दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा गंभीर आरोप केलाय. संभाजीनगरमध्येच भाजपच्या महिलांना पाठवून माझ्यावर फडणवीस यांना हल्ला करायचा होता. मात्र त्यांचा तो डाव फसला आहे, असं जरांगे पाटील म्हणालेत.
फडणवीसांचा तो डाव फसला असला तरी आता पुन्हा भाजपच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव देवेंद्र फडणवीसांनी आखलाय, असा खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. दौऱ्यासाठी मी पुन्हा बाहेर निघालो आहे.अत्ता तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना आम्हाला अडवायला सांगा. मी घाबरत नाही, असं आव्हान त्यांनी या वेळी देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे.