सोलापूर, वृत्तसंस्था
धाराशिव-सोलापूर सीमेवरील ढेंबरेवाडी (ता. बार्शी) परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघ ठाण मांडून बसलेला आहे. मंगळवारी (ता. २४) सायंकाळी पाच वाजता पुन्हा वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला आहे. त्यामुळे त्याचा येडशी घाटातील मुक्काम वाढला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी आढळेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर त्याचे पुन्हा दर्शन झाल्याने त्याचा वावर एकाच ठिकाणी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे, तर सीमेवरील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात वाघाने दहशत पसरविली आहे. गेली दोन दिवस तो आढळून आलेला नव्हता. तसेच, त्याने कुठे हल्लाही केलेला नव्हता. दोन दिवस आढळून न आलेल्या वाघाने मंगळवारी पुन्हा दर्शन दिल्याने वन विभाग सतर्क झाला आहे.
सोलापूर विभागाचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक म्हणाले, शेतकरी तसेच जनावरांच्या सुरक्षिततेसाठी अभयारण्याच्या सीमेवर सोलर कुंपण उभारण्याचा प्रस्ताव वन विभागातर्फे पाठविण्यात येणार आहे. किती क्षेत्रावर हे कुंपण उभारावे लागेल, याचे मोजमाप अजून आलेले नाही, ते आले की प्रस्ताव पाठविला जाईल. कॅमेरेही बसविले आहेत. जिल्हा समितीचीही स्थापना करण्यात येणार आहे. पण, अजून वाघाने तशी हानी पोचविलेली नाही. त्याचा स्वभावही अजून तसा दिसून आलेला नाही. शेवटी तो हिंस्र वन्यप्राणी आहे. त्यामुळे निश्चित काही सांगता येत नाही. तो हल्ला करू शकतो. वाघाने जनावरांवर हल्ला केल्यास पशुपालक, शेतकऱ्यांनी जनावरांना वाचविण्याचा प्रयत्न केल्यास तो माणसावरही हल्ला करू शकतो.“
येडशी अभयारण्य परिसरात जोडीदार वाघीण नसल्याने तो अधिक काळ या परिसरात राहण्याची शक्यता कमी आहे. सध्या तो अभयारण्याचा प्रदेश बघतो आहे. त्याला वाघिणीचा स्मेल न आल्यास तो पुढे जाऊ शकतो. याबाबत तज्ज्ञांशीही चर्चा केली आहे. त्यांचेही हेच म्हणणे आहे की या भागात वाघीण नसल्याने तो थांबण्याची शक्यता कमी आहे.
– कुशाग्र पाठक, उपवनसंरक्षक, सोलापूर
येडशी अभयारण्यात मंगळवारी सायंकाळी ढेंबरेवाडी (ता. बार्शी, जि. सोलापूर) परिसरात पाच वाजता वाघ पुन्हा ट्रॅप कॅमेऱ्यात आढळून आलेला आहे. गेली काही दिवसांपासून त्याचा वावर लातूर-टेंभुर्णी मार्गाशेजारील तलावाजवळच आहे.
– अलका करे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बार्शी.