---Advertisement---

जेजुरीत विजयाचा आनंद दुःखात बदलला; भंडाऱ्याला आग, १६ जण गंभीर भाजले

By team
On: December 22, 2025 10:10 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

 

राज्यातील स्थानिक निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु असताना जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करत असतानाच दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. खंडेरायाच्या गडाच्या पायथ्याशी विजयाचा भंडारा उधळत असताना अचानक आगीचा मोठा भडका उडाला. या आगीत नवनिर्वाचित नगरसेवकांसह 16 जण गंभीररीत्या भाजले असून, त्यांच्यावर स्थानिक खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जेजुरीमध्ये खळबळ उडाली असून आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले आहे.

रविवारी दुपारी नगरपरिषदेचे निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जेजुरीत मोठी मुसंडी मारली. विजयाचा जल्लोष करण्यासाठी कार्यकर्ते आणि विजयी उमेदवार गडाच्या पहिल्या पायरीजवळ जमले होते. खंडेरायाला भंडारा अर्पण करत असतानाच बाजूला फटाक्यांची मोठी आतषबाजी सुरू होती. यावेळी भंडाऱ्याची उधळण केली जात असताना फटाक्यांच्या ठिणगीमुळे भंडाऱ्याने अचानक पेट घेतला आणि आगीचा लोळ उठला. भंडाऱ्यात रासायनिक भेसळ असल्यानेच ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

राजकीयदृष्ट्या या निवडणुकीत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. माजी आमदार संजय जगताप यांची जेजुरीमधील सत्ता खालसा करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. नगरपरिषदेच्या एकूण 17 जागांवर राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले आहेत, तर भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. संजय जगताप यांच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांनी जयदीप बारभाई यांना पक्षात घेऊन खेळलेली खेळी यशस्वी ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

या दुर्घटनेनंतर जेजुरीमध्ये मिळणाऱ्या भंडाऱ्याच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जेजुरीत भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. आजच्या घटनेत भंडाऱ्याने ज्या पद्धतीने पेट घेतला, त्यावरून या भंडाऱ्यात ज्वालाग्राही रसायने असल्याचा संशय बळावला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. आगीत होरपळलेल्या 16 जणांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने उपचार देण्यात येत आहेत. यात नुकत्याच विजयी झालेल्या काही नगरसेवकांचाही समावेश असल्याने त्यांचे समर्थक आणि कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासन या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!