मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरणातील एक आरोपी अद्याप अटकेत नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि, त्याने खूप पाप केले आहे, आता त्याला फेडावं लागणार आहे, तो आता सुटणार नाही. परंतु, तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. बीड प्रकरणातील एक जरी आरोपी सुटला, तर राज्य बंद पडू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज (दि.२२) सुनावण्यात आली. यावर जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
वाल्मीक कराडचा पाठीराखा मंत्री आहे, तो सुद्धा आता यात यायला पाहिजे. देशमुख कुटुंब तुमच्या घरी आले आहे. तुमचं कुटुंब म्हणून तुम्हाला देशमुख कुटुंबाकडे पाहावे लागणार आहे. त्या कुटुंबाचा अपमान होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये, असे ते म्हणाले. बीड प्रकरणातील आरोपी सुटला, तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. आरोपी देशमुख कुटुंबाला संपवू शकतात, अशी शंकाही जरांगे यांनी यावेळी व्यक्त केली. न्याय देवता न्याय करेल, आरोपींना फासावर लटकवेल, असा विश्वास जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला.