ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोल्हापूरवासियांची वनताराने मागितली माफी ; ‘माधुरी’ हत्तीणीचे आता पुढे काय ?

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील जैन मठातील ‘माधुरी’ हत्तीणीच्या स्थलांतराच्या वादावर वन्यजीव संघटना ‘वनतारा’ने बुधवारी एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, ‘माधुरी’ हत्तीणीला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय त्यांचा नव्हता, तर तो माननीय सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाला.

वनतारा म्हणाले की, न्यायालयाच्या निर्देशांनुसार, त्यांची भूमिका माधुरीची काळजी, पशुवैद्यकीय मदत आणि तात्पुरते पुनर्वसन यापुरती मर्यादित होती. त्यांनी माधुरीला स्थलांतरीत करण्याची शिफारस केली नाही किंवा कोणताही निर्णय घेतला नाही. जर आमच्या कोणत्याही शब्दांमुळे, निर्णयांमुळे किंवा कार्यपद्धतीमुळे जैन समुदायाचे किंवा कोल्हापूरच्या लोकांना दुखावले असेल तर आम्ही त्याबद्दल मनापासून माफी मागतो.

१६ जुलै रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने माधुरीला वनतारा येथे हलवण्याचा आदेश दिला होता. पेटा इंडियाने हत्तीणीच्या आरोग्याबद्दल, संधिवाताबद्दल आणि मानसिक ताणाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर हा आदेश देण्यात आला.

डिसेंबर २०२४ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने हत्तीणीच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी तिला गुजरातमधील वनतारा प्राणी अभयारण्यात हलवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर २९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयानेही हा आदेश कायम ठेवला. हा खटला २०२३ पासून सुरू आहे.

माधुरीला वनतारा येथे हलवण्यात आल्यानंतर कोल्हापुरात मोठा निषेध व्यक्त करण्यात आला. तिला परत आणण्यासाठी लोकांनी स्वाक्षरी मोहीत राबवली. धार्मिक परंपरा आणि भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला.

  • स्थानिक भाविकांच्या आणि मठाशी संबंधित संतांच्या भावनांचा आदर करत, वनतारा म्हणाले की त्यांना कोल्हापूर आणि जैन समुदायाच्या भावना समजतात. ते त्यांचा आदर करतात.
  • जर महाराष्ट्र सरकार आणि मठाने सर्वोच्च न्यायालयात माधुरीच्या कोल्हापूरला परतण्यासाठी कायदेशीर परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केला, तर वनतारा त्यांना पूर्ण पाठिंबा देईल. तिच्या सुरक्षित आणि सन्माननीय परतीसाठी सर्व तांत्रिक आणि वैद्यकीय सहाय्य प्रदान करेल.
  • कोल्हापूरजवळील नांदणी परिसरात माधुरीसाठी एक रिमोट रिहॅबिलिटेशन सेंटर उभारता येईल, हे सेंटर मठ आणि राज्य सरकारच्या सहकार्याने चालवले जाईल. प्रस्तावित सेंटरमध्ये हायड्रोथेरपी तलाव, वेगळे स्विमिंग पूल, लेसर थेरपी, रबर फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म, सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालये आणि माधुरीला बरे होण्यास आणि आरामदायी जीवन जगण्यास मदत करण्यासाठी खुल्या हिरव्या जागा यासारख्या आधुनिक सुविधा असतील. तिला साखळ्यांशिवाय मुक्तपणे फिरण्याची परवानगी देखील असेल.
  • हा प्रस्ताव कोणत्याही प्रकारचे श्रेय घेण्यासाठी किंवा संस्थेच्या फायद्यासाठी नाही, तर केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी आणि माधुरीच्या कल्याणासाठी आहे. जर मठ किंवा महाराष्ट्र सरकार न्यायालयासमोर कोणताही पर्यायी प्रस्ताव मांडू इच्छित असेल, तर ते त्यासाठी पूर्णपणे तयार आहेत आणि त्यात सहकार्य करतील, असेही संस्थेने म्हटले आहे.

वनतारा संस्थेने म्हटले आहे की, जर त्यांच्या कोणत्याही बोलण्याने, निर्णयाने किंवा कृतीमुळे जैन समुदाय किंवा कोल्हापूरमधील लोकांना दुःख झाले असेल, तर ते मनापासून माफी मागतात. “मिच्छामी दुक्कडम” जर आम्ही कोणालाही जाणूनबुजून किंवा नकळत दुखावले असेल, तर कृपया आम्हाला क्षमा करा. आमचा उद्देश केवळ माधुरीचे कल्याण आहे. आम्ही सर्वांनी मिळून तिच्या हितासाठी एकत्र आले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!