---Advertisement---

तुम्ही एवढे घाबरून का गेले आहात? दादा प्रेमीचे पत्र व्हायरल !

By team
On: September 12, 2024 9:58 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु असली तरी महायुतीमध्ये अजित दादांच्या पक्षाला डावलण्यात येत असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना नुकतेच अजितदादांच्या बाजूने बोलतो अाहे, असे दाखवून त्यांचीच टिंगल उडवणारे एक पत्र व्हायरल झाले आहे. ते दादांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने लिहिले, असे दिसत आहे. मात्र, त्यातील भाषा, संदर्भ आणि प्रश्न लक्षात घेता ते दादा निष्ठावंतांच्या नावाखाली अन्य कुणी लिहिले असावे, अशी शंका व्यक्त होत आहे. महायुतीतून बाहेर पडण्याची पार्श्वभूमी अजित पवार तयार करत आहेत की काय, अशीही चर्चा होत आहे. या पत्रात अजितदादा तुम्ही एवढे घाबरले का आहात? आम्ही तुमच्यासाठी पवार साहेबांना धोका दिला, पण आम्हाला काय मिळाले? असा सवालही विचारण्यात आला आहे.

बुधवारी व्हायरल झालेल्या या पत्रात अजितदादांना उद्देशून म्हटले आहे की, आजकाल तुमचं वागणं, बोलणं, सांगणं आणि ऐकणंसुद्धा पार बदलून गेलंय. तुम्ही टीव्हीच्या मुलाखतीत आणि जनसन्मान यात्रेच्या भाषणात ‘चूक’ झाली म्हणून जी काही जाहीर कबुली देताय, त्यामुळे तुमचं नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न माझ्या सारख्या लाखो दादाप्रेमी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. काल-परवाच्या बारामतीच्या सभेत तुम्ही भरभरून बोललात. मात्र, तुमचा ‘सूर’ नेमका कळत नव्हता? तुम्ही खदखद व्यक्त करताय की सहानुभूती मिळविताय? किंवा भावनिक कार्ड खेळताय की मन मोकळं करताय? हेचं नेमकं समजत नव्हतं आणि अजूनही समजलेलं नाही. कारण, आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोक आणि लढावू बाणा हरवला आहे की काय? अशी भीती वाटत राहाते.

बघा ना, दादा तुम्ही माफी मागून मोकळे झालात. त्याच्या सर्वत्र बातम्या झाल्या. पण, या सगळ्या घडामोडीत आम्ही मात्र, पवार साहेबांच्या लेखी वाईट ठरलो. आता आम्ही नेमकी कुणाची माफी मागायची? हेही एकदा सांगा. तुमच्या निर्णयामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते दोन गटात विभागलो गेलोय. आता आम्ही एकमेकांचे तोंड सुद्धा बघत नाही. कामापोटी सहज बोललो किंवा निवांत गप्पा जरी मारल्या, तरी आमच्यावर संशय घेतला जातो. एवढं कलुषित वातावरण झालंय. अशावेळी तुम्ही मात्र, माफी मागून किंवा चूक कबूल करून आमचीचं पंचाईत केलीय. त्यामुळे माफी मागून तुम्ही तुमचा स्वार्थ साधला, आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलं अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात का येवू नये? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

दादा, लोकसभेच्या प्रचारात तुम्ही भावनिक होवू नका. विकासाला महत्त्व द्या, असं म्हणत होतात. पण, आता मात्र तुम्ही स्वत: खूपच भावूक होऊन आम्हालाही भावनिक करताय. त्यामुळे तुम्हाला नेमकं झालंय तरी काय? तुम्ही एवढे घाबरून का गेला आहात? तुमचा आत्मविश्वास पहिल्यासारखा का दिसत नाही? तुम्ही कसल्या तरी, कोणाच्यातरी ओझ्याखाली दबल्याचे वातावरण का निर्माण झाले आहे? कधी नव्हे ते तुम्ही इतके हतबल का दिसत आहात? असे अनेक प्रश्न मला व आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पडले आहेत, असा दावाही या पत्रातून करण्यात आला आहे.

‘तुझी ग्रामपंचायत आली का रे’ किंवा ‘माईक चालू राहू दे, आपलं सगळं उघड असतं’ असं जाहीरपणे सांगणारे कणखर दादा आता पहिल्यासारखे वाटत नाहीत. सध्या तुम्ही फार चिडचिड करताय. राग, संताप व्यक्त करताय. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी एकटाच नव्हे तर, आपले सगळे जीवाभावाचे पदधिकारी, कार्यकर्ते आणि जवळची सगळी मंडळी घाबरून गेली आहेत. कारण, वैनींच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सगळेच जबाबदार आहोत अशी तुमच्या मनाची भावना झाली आहे, असे तुमच्या बोलण्यावरून सतत जाणवते. म्हणून तुमचं असं संशयाने पाहाणे, आता सहन होत नाहीये, जीवाची घालमेल होत आहे, असा पत्र लिहिणाऱ्याचा दावा आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!