मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूर आला, यात शेती उद्धवस्त झाली. इतकेच काय तर जमीनच खरडून गेली. त्यामुळे सर्व शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्या दृष्टीने शेतीची जमीन हे त्याचे सर्वस्व आहे. कोणत्या मनस्थितीत शेतकरी दिवाळी साजरी करणार? त्यामुळे आमच्या पक्षाला आज राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केले.
“शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही. मला यामध्ये राजकारण आणायचे नाही. पण पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. आम्ही तशी तयारी राज्य सरकारकडे दाखवली. पण शेतकरी आणि पूरग्रस्तांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची तयारी आतापर्यंत तरी दिसून आलेली नाही,” असे शरद पवार यांनी म्हटले.
“संकट येतात पण अशावेळी ज्यांच्या हातात राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची जबाबदारी असते लोकांना संकटातून बाहेर काढणे हातभार लावायचा. आजच्या राज्य सरकारने काही तोकडी रक्कम काही लोकांना जाहीर केली. पण नुकसानीच स्वरूप बघितलं तर या तोकड्या रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे. मी एवढे सांगू इच्छितो की, हे जे काही घडतेय ते दुःखद आहे, त्याबाबत मला अधिक भाष्य करायचे नाही,” असे शरद पवार यांनी म्हटले.