मुंबई : केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर जोर दिला गेल्यानंतर सुरूवात केल्यानंतर नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे डिजिटल पेमेंटचे प्रमाण आणखीनच वाढले. गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ही डिजिटल पेमेंट अॅप युजर्समध्ये विशेष लोकप्रिय आहेत. अनेक खासगी बँकांनी UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा सुरू केली.
भारतात डिजिटल पेमेंट अॅप्स अल्पावधीत लोकप्रिय झाली आहेत. सध्या देशात यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून महिन्याला जवळपास 200 कोटीची देवाणघेवाण होते. यामध्ये फोन पे आणि गुगल पे ही अॅप्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या दोन अॅप्सच्या माध्यमातून जवळपास 82 टक्के व्यवहार होतात.
मात्र, मागील काही दिवसांपासून डिजिटल पेमेंट व्यवहारांवर आता शुल्क आकारले जाणार असल्याच्या बातम्या फिरत आहे. 1 जानेवारी 2021 पासून यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करणे सशुल्क होणार, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या अॅप्सचा वापर करणारे युजर्स चांगलेच नाराज झाले होते. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) ट्विट करून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आगामी वर्षात डिजिटल पेमेंटसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही, असे NPCI कडून सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सूचना विभागानेही (PIB) हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘गुगल पे’ कडून स्पष्टीकरण
ट्विटरवर एका युजरने यासंदर्भात ‘गुगल पे’ला टॅग करत शंका विचारली होती. 1 जानेवारी 2021 पासून गुगल पे वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार का, असा प्रश्न युजरने विचारला होता. त्यावर गुगल पे ने सशुल्क योजना ही केवळ अमेरिकेपुरती मर्यादित असल्याचे म्हटले होते. भारतातील ‘गूगल पे’ किंवा ‘गूगल पे फॉर बिझनेस’ या अॅप्सशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे ‘गुगल पे’ ने स्पष्ट केले होते.