कांद्यावर निर्बंध लावणे, एकीकडे निर्यातीवर बंधने आणून आयात करणे ही परस्परविरोधी भूमिका पटत नाही – शरद पवार
नाशिक दि. २८ : जीवनावश्यक वस्तूंमधून कांदा वगळला असताना त्यावर निर्बंध लावणे, एकीकडे निर्यातीवर बंधने आणून आयात करणे ही परस्परविरोधी भूमिका पटत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
आज नाशिक भेटीदरम्यान कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या.
कांदा प्रश्न हा केंद्रसरकारशी बोलून निकालात काढावा लागेल. केंद्रामध्ये ज्यांच्या अख्यत्यारित हा प्रश्न आहे त्यांच्याशी संपर्क साधून शेतकरी व व्यापारी प्रतिनिधींनी एकत्रित येऊन त्यांची वेळ घ्यावी अशी सूचनाही शरद पवार यांनी केली.ज्यांच्या अधिकारात निर्णय होऊ शकतो त्यांच्याशी चर्चा करून सवलती मिळवून देण्यासंबंधी आग्रह धरण्याची आवश्यकता आहे. कांद्याच्या प्रश्नाबाबत योग्य धोरण ठरले पाहिजे. या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर राज्य सरकारपेक्षाही केंद्र सरकारच्या धोरणांच्यामार्फतच हे बदल आपण करू शकतो असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.कांदा लिलाव बंदीप्रकरणी शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. पण राज्यशासनाला यासंबंधीचे अधिकार नाहीत. कांद्याच्या आयात-निर्यातीसंदर्भातील निर्णय हे राष्ट्रीय पातळीवर होत असल्याने राज्याकडून यासंबंधी फारशा अपेक्षा ठेवणे योग्य ठरणार नाही असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.पण व्यापार हा व्यवस्थित सुरू राहिलाच पाहिजे. व्यापाऱ्यांनी मार्केट बंद ठेवण्याबाबत फेरविचार करावा असे मला वाटतं. मार्केटमधल्या ज्या अडचणी आहेत त्या एकत्र बसून सोडवण्याची माझी भूमिका आहे. व्यापाऱ्यांना काही त्रास होतोय हे मला मंजूर आहे. पण म्हणून इतरांना त्रास व्हावा ही त्यांची भावना निश्चितच नसेल. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार सुरू ठेवावेत, शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूंनी नुकसान होऊ देऊ नये, अशी आग्रहाची विनंती शरद पवार यांनी या बैठकीत व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना केली.