नवी दिल्ली: जवळपास वर्षभरापूर्वीपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचं अभिनंदन करत संबोधित केलं.
भारतातील लसीकरण अभियान मानवीय आणि महत्त्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ज्या सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सर्वात आधी लस दिली जाईल. ज्याला करोना होण्याचा धोका सर्वाधिक आहे, त्या व्यक्तींना सर्वात आधी लस मिळेल. आपले डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना सगळ्यात आधी लस दिली जाईल. या सगळ्यांचा करोना लसीवर पहिला हक्क आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि कायदा सुव्यस्थेची जबाबदीर असणाऱ्या लोकांना लस दिली जाईल,” असं मोदी म्हणाले.
पहिल्या टप्प्यात तीन कोटी कोविड योद्ध्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना करोनाची लस देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल. तुम्ही कल्पना करू शकता की, ३० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले फक्त तीनच देश आहे. चीन, अमेरिका आणि भारत,” असं मोदी म्हणाले.