---Advertisement---

हेलिपॅडवर बॅग तपासल्याने उद्धव ठाकरे संतापले

By team
On: November 11, 2024 6:37 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था 

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची आज वणी येथे सभा पार पडली. या सभेसाठी ठाकरे हेलिकॉप्टरने सभास्थळी रवाना झाले होते. यावेळी हेलिपॅडवर उतरताच ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर सभेत उद्धव ठाकरे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधल्याचे दिसून आले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी प्रचाराला आल्यानंतर सात ते आठ अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली. मी त्यांना परवानगी दिली. मी त्यांचा व्हिडिओ काढला. पण यापुढे कुणाची बॅग तपासण्यात आली, तर प्रथम त्या अधिकाऱ्याचे ओळखपत्र तपासा, तो कुठल्या हुद्द्यावर आहे हे जाणून घ्या. जसे ते तुमचे खिसे तपासत आहेत, तसेच त्यांचेही खिसे तपासा. हा आपला अधिकार आहे. जिथे कुठे नाकानाक्यावर अडवतील तिथे-तिथे तपास अधिकाऱ्यांचे खिसे तपासा. माझ्या बॅगा तपासल्याबद्दल मी अधिकाऱ्यांवर रागावलो नाही. पण त्यांनी जशी माझी बॅग तपासली, तशी मोदी-शाह यांच्यासह दाढीवाला मिंधे, गुलाबी जॅकेटसह टरबुजाचीही (फडणवीस) बॅग तपासण्याचे धाडस दाखवावे”. “पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात सभेसाठी येतात. मोदी आल्यानंतर रस्ते बंद होतात. मग हे रस्त्याने सुसाट जातात. मात्र, पंतप्रधान मोदी असो किंवा अमित शाह असोत किंवा देवेंद्र फडणवीस, अजित पवार असोत. यांच्या बॅगा जर निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या बॅगा तपासतील. मग मात्र,निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्ये यायचे नाही.आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे, तसं प्रचाराला जो कोणी येईन त्याची बॅग तपासण्याचा अधिकार मतदारांना आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

तसेच वणीमधील सभेमधून बोलताना पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की,”स्वतः मोदी यांना बाळासाहेब यांचे नाव घेऊन मते मागावी लागत आहेत. त्यामुळे मोदी गॅरेंटी चालत नाही हे आता कळाले आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आपण तीन हजार रुपये देणार आहोत. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार करून पेटवून दिले जात आहे. महिला सुरक्षेबद्दल काही बोलले जात नाही. महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहेत. शेतकरी हमीभाव मागतो आहे. मात्र, भाजपा त्यांना काश्मीरमधील ३७० रद्द केल्याचे आणि राम मंदिर बांधल्याचे सांगत आहे. राज्यातील मुलभूत प्रश्नांवर भाजपा बोलत नाही. महायुतीकडून मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातील सात बाराही अदानींच्या नावे होऊ शकतो”, असा दावाही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!